गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

कविता : आक्रोश

तहानलेल्या पाणी मिळो
हा नियतीचा आवडता खेळ ।
अपेक्षा करावी अन् भंग व्हावा
चपखल बसे हा मेळ ।।१।।

काही योजावे, प्रयत्नही करावा
अन् शेवटी निराशाच यावी ।
सर्वोच्च शक्तीने केला अन्याय
सांगा, फिर्याद कोठे करावी? ।।२।।

भावनेचा हा गुंता,
वाढतच जातो ।
"आधारस्तंभां"वर टेकून रडावे
पण त्यांनाही त्रास नको ।।३।।

साथ नाही कोणाची
मिळालीच तर "खोटे"पणाची ।
तमा नाही वाटत आता
फसविल्या गेल्याची ।।४।।

एकल्याचा मार्ग माझा
एकलाच आक्रमितो ।
"कर्मण्येवाधिकारस्ते"
श्लोक मनी आठवितो ।।५।।

मुस्कटदाबी ही सारी
मुकेपणाने सोसतो ।
अंंतरी जखमी जरी
स्मित ओठांवर राखितो ।।६।।

"आक्रोश" मनी खूप झाला
आता शांतता ईच्छितो ।
अंधारात धडपडताना
साथ समईची मागतो ।।७।।



         - जयराज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा