पुणे आणि मी : भाग १ वरून पुढे...
हा (सागर), पक्का पुणेकर अवलिया, CDAC कोर्सच्या वेळी प्रॅक्टिकल्स ला माझ्या बाजूच्या संगणकावर (Computer) बसायचा आणि माझी व याची, त्यावेळी ओळख नसतानाही मला अनेक नावं त्याने ठेवली होती. हेही मला याच पठ्याने नंतर ओळख झाल्यावर सांगितले आणि हद्द म्हणजे नंतरही माझ्या जवळच्या मित्रांसोबत माझ्या नातवा-परतंवडां पर्यंतची नावं याने तयार केलेली आहेत. आता त्याच्याच ती किती लक्षात आहेत, हा भाग निराळा....!!!
आम्ही दोघेही सुरुवातीला एकाच कंपनीत (CDAC) कामाला लागलो. याच्यामुळेच पुण्यात फिरणं मला अगदी सुसह्य झालं... कधीही याच्या घरी गेलो की जेवल्याशिवाय न जाऊ देणारा हा....!!! याच्या घरातील कार्यक्रम असो वा सोसायटीत... अध्यक्षस्थानी हेच...!!! आणि मला निमंत्रण वगैरे सोपस्कार नाहीत.... "हा कार्यक्रम आहे... ये..." डायरेक्ट....!!!
गणेशोत्सवात पेठांमधील रस्ते बंद झाले की गल्ली-बोळांतून नेऊन पुणे दर्शन घडविणारा हाच...!!! ओंकारेश्वरहून सरळ शनिवार पेठेत आणि तिथून थेट शनिवारवाडा.... टिळक रोडकडे जाताना वन वे कुठला... कुठल्या रोडने कधी ट्रॅफिक नसतं... अलका चौकातून किंवा डेक्कनहून सदाशिव पेठेत किंवा स्वारगेटला जाताना गर्दी कशी चुकवायची... लक्ष्मी रोडवर फिरायचं असेल तर गाडी कुठं लावायची, हमखास पार्किंग कुठं मिळेल याची इत्थंभूत माहिती यानेच दिली....
लकडी पुलावरचा, "दुचाकी वाहनांना प्रवेश बंद...!!!" हा फलक (Board) मात्र मीच याला PMT मधून दाखवला. तोवर इतर पुणेकरांप्रमाणे त्यालाही हे ऐकूनच माहिती होते...!!!
कार चालवत असेल तर फार नाही पण बाईकवर, मग पुढे बसलेला असो वा मागे, स्वारगेट चौकातल्या सिग्नल पाशीही, "ओ काका, असं सरळ निघायचं, म्हणजे सगळ्यांना जागा मिळते" असं बिनधास्त ओरडून, सर्वांना पुणेरी शैलीत वाहतुकीचे नियम सांगणारा हा...!!!
याच्यामुळे पुण्याच्या गल्ल्यांमध्ये मी हरविण्याची शक्यता कमीच...!!!
आमच्यात मतभेद खूपदा होतात. किंबहूना, एखाद्या गोष्टीवर आमचं "लवकर" एकमत होणं फारच दुर्मिळ...!!! मग ते कोणासाठी तरी एखादी भेटवस्तू खरेदी करणं असो वा कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवरील चर्चा असोत... मतभेद होणारचं...!!! उलट तसं नाही झालं तर आम्हांलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. असे जरी असले तरी आमच्यात "मनभेद" अजिबात नाही. आधी भांडून मग, कधी त्याने, कधी मी कमीपणा घेत, वेळ निभावून नेतो. कदाचित, याच विजोड प्रवृत्तीमुळे म्हणा हवं तर, पण आमची मैत्री मस्त टिकून आहे.
आमची मैत्री अशी,
टिळक-आगरकर जशी...!!!
(टिळक-आगरकरांचे नाव केवळ उदाहरणादाखल... वैचारिक मतभेद असले तरी समान उद्दिष्ट्य आणि निखळ मैत्री हे दर्शविण्यासाठी... )
पुणेकर आणि त्यांचा इरसालपणा, पुणेरी पाट्या हे तर सर्वांसाठी हक्काचे विनोदाचे विषय...!!! त्यातून दुपारी १ ते ४ झोपण्याच्या सवयीचे तर वाजवीपेक्षा जास्तच... चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद म्हणजे बंदच, असे विनोदाने सांगताना त्यांचा दिवसही पहाटे ३-४ वाजता सुरू होतो, हे कोणी लक्षात घेत नाही... आणि हे खुद्द चितळ्यांच्याच एका मुलाखतीत वाचल्याचे स्मरते... मग आता दुपारी घेतली थोडी विश्रांती तर कुठं बिघडलं...? पुणेकर असले तरी माणसंच आहेत ती...!!! जगात कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा माणूस, त्याच्या बोलण्याच्या अंदाजावरुन, कुठेही सहज ओळखता येतो...
पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीला मी कधी गेलो नाही, पण, मानाच्या गणपतींसह इतर मंडळाचे देखावे मात्र अनेकदा पाहिले... कित्येक रविवारच्या संध्याकाळ मस्त पर्वतीहून पुण्याचा रम्य देखावा पाहण्यात घालवल्या... कधी मित्रांसमवेत तळजई... कधी जवळपासचे गड-किल्ले... सिंहगड तर अगदी फार्म हाऊस वाटावे इतके वीकेंड घालवले आहेत... छत्रपतींच्या पावनस्पर्शाने पुलकित झालेले किल्ले आजही खूप सुंदर अनुभुती देतात...
काहीच नसलं तरी शुक्रवारच्या संध्याकाळी सातारा रोड येथील "कोल्हापूरी कट्टा" (आता ते हॉटेल बंद तरी झालंय किंवा दुसर्या नावाने तरी सुरू आहे) मध्ये जाऊन मस्त चिकन थाळी, तांबडा - पांढरा वरपायचा... अन् शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सिटी प्राईड, सातारा रोड, मध्ये एखादा चित्रपट...!!!
जगासाठी पुणे हा एक मोठ्या भूभागाचे क्षेत्र असेल, पण, पुण्याचे पुणेरीपण पेठांमध्येच दडले आहे. फार फार तर शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड, पर्वती आणि आसपासचा प्रदेश आदी यांत सामिल करता येईल... कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणीही मोठ्या संख्येने पुणेकर दिसून येतात... कात्रज, औंध, बाणेर, कोरेगांव पार्क यांना फार तर जुळे पुणे अथवा नवं पुणे म्हणता येईल... विद्यापीठ तर कधी काळी पुण्याहून खूपच दूरचा प्रदेश मानला जात असे, हे आता सांगूनही खोटं वाटेल, इतकं पुणे पसरलं आहे.
पेठांतील रस्ते, त्यावरची होणारी कोंडी, पुण्याच्या बसेस, रिक्षा हे तर ग्रंथ लिहता येईल असे विषय....!!! पण, पेठांतील वाडे, मंडई, विद्यापीठ यांसारख्या जुन्या परंतु डौलदार अन् दिमाखदार वास्तू, हे पुण्याचे खरे वैभव...!!!
ज्ञानोबा माऊली अन् तुकोबारायांचे पुणे...!!! शहाजीराजांच्या बेचिराख झाल्या या प्रांतात पुन्हा नंदनवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे पुणे...!!! स्वराज्य संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुणे...!!! स्वराज्याची सीमा दिल्ली पर्यंत नेणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे पुणे...!!! अटकेपार मराठी ध्वज फडकविणाऱ्या रघुनाथराव पेशवे उर्फ राघोभरारींचे पुणे...!!! ब्रिटिशांनाही चळाचळा कापायला लावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पुणे...!!! थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुलेंचे पुणे...!!! पु. ल. देशपांडे, शांता शेळकेंचं पुणे...!!! विद्येचे माहेरघर अन् महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले पुणे...!!! दुचाकी स्वारांचे, पेन्शनरांचे, विद्यार्थांचे अन् आता IT Hub बनू पहात असलेले पुणे...!!! शुध्द मराठी भाषेचे पुणे....!!! पारंपारिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे पुणे...!!! पुण्याला पुणे म्हणणाऱ्यांचे पुणे...!!!
अशा पुण्याचा पुणेकरांनी जाज्वल्य अभिमान का न बाळगावा...?
पेठांमधील वाड्यांनी आता आपली जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे ग्रामदैवत, कसबा गणपती, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार जिजामाता मासाहेबांनी पुण्यात प्रथम वस्तीस आल्यावर केला, असे सांगितले जाते, त्या आमच्या श्रद्धास्थानाच्या बाजूला मोठी इमारत बांधली जात आहे. त्याच्या आवाजाने त्या दगडी कौलारू मंदिरातील शांतता कमी होत चालली आहे, असे मला वाटते...
हळूहळू का होईना पण पुणे बदलत चाललंय हे मात्र खरं... बदल हा निसर्ग नियमच आहे. या बदलांतही लाल महाल, विश्रामबाग वाडा, केसरी वाडा आदी काही ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहेत किंवा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत...!!! शनिवारवाडा मात्र ब्रिटिश काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला अन् आता त्या भग्नावशेषात केवळ त्याची भव्यता अन् निर्माण केलेल्या हिरवळीतून (बगीचा) त्याच्या सुंदरतेची फक्त कल्पनाच करायची...!!!
बदल, विकास करत असताना आपला हा सांस्कृतिक अन् ऐतिहासिक ठेवा आपण जतन करायलाच हवा असे एक इतिहास प्रेमी म्हणून मला नेहमीच वाटते.
संपूर्ण भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि त्यातील माझे जन्मगाव सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, वैष्णौदेवी (कट्रा) आणि पुणे इथं मला कधीच एकटं वाटत नाही... माझ्या घरात असल्यासारखंच वाटतं...
पुण्यावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे... त्यामुळे आता इथेच थांबतो...!!! राग व्यक्त करताना घडाघडा बाहेर पडणारे शब्द प्रेम व्यक्त करताना थोडेसे अबोल होतात, असंच काहीसं माझं झालं आहे... मनातल्या साऱ्या भावना शब्दांत थोडीच व्यक्त करता येतात? आणि तसंही अखंड बोलत राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार केवळ पुणेकरांनाच आहे...!!!
खरंच, पुणे तिथे काय उणे...?
शेवट करताना पु. लं. ची पुण्यावरची कविता लिहितो,
मी राहतो पुण्यात,
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्र जागा नाही.
हा (सागर), पक्का पुणेकर अवलिया, CDAC कोर्सच्या वेळी प्रॅक्टिकल्स ला माझ्या बाजूच्या संगणकावर (Computer) बसायचा आणि माझी व याची, त्यावेळी ओळख नसतानाही मला अनेक नावं त्याने ठेवली होती. हेही मला याच पठ्याने नंतर ओळख झाल्यावर सांगितले आणि हद्द म्हणजे नंतरही माझ्या जवळच्या मित्रांसोबत माझ्या नातवा-परतंवडां पर्यंतची नावं याने तयार केलेली आहेत. आता त्याच्याच ती किती लक्षात आहेत, हा भाग निराळा....!!!
आम्ही दोघेही सुरुवातीला एकाच कंपनीत (CDAC) कामाला लागलो. याच्यामुळेच पुण्यात फिरणं मला अगदी सुसह्य झालं... कधीही याच्या घरी गेलो की जेवल्याशिवाय न जाऊ देणारा हा....!!! याच्या घरातील कार्यक्रम असो वा सोसायटीत... अध्यक्षस्थानी हेच...!!! आणि मला निमंत्रण वगैरे सोपस्कार नाहीत.... "हा कार्यक्रम आहे... ये..." डायरेक्ट....!!!
गणेशोत्सवात पेठांमधील रस्ते बंद झाले की गल्ली-बोळांतून नेऊन पुणे दर्शन घडविणारा हाच...!!! ओंकारेश्वरहून सरळ शनिवार पेठेत आणि तिथून थेट शनिवारवाडा.... टिळक रोडकडे जाताना वन वे कुठला... कुठल्या रोडने कधी ट्रॅफिक नसतं... अलका चौकातून किंवा डेक्कनहून सदाशिव पेठेत किंवा स्वारगेटला जाताना गर्दी कशी चुकवायची... लक्ष्मी रोडवर फिरायचं असेल तर गाडी कुठं लावायची, हमखास पार्किंग कुठं मिळेल याची इत्थंभूत माहिती यानेच दिली....
लकडी पुलावरचा, "दुचाकी वाहनांना प्रवेश बंद...!!!" हा फलक (Board) मात्र मीच याला PMT मधून दाखवला. तोवर इतर पुणेकरांप्रमाणे त्यालाही हे ऐकूनच माहिती होते...!!!
कार चालवत असेल तर फार नाही पण बाईकवर, मग पुढे बसलेला असो वा मागे, स्वारगेट चौकातल्या सिग्नल पाशीही, "ओ काका, असं सरळ निघायचं, म्हणजे सगळ्यांना जागा मिळते" असं बिनधास्त ओरडून, सर्वांना पुणेरी शैलीत वाहतुकीचे नियम सांगणारा हा...!!!
याच्यामुळे पुण्याच्या गल्ल्यांमध्ये मी हरविण्याची शक्यता कमीच...!!!
आमच्यात मतभेद खूपदा होतात. किंबहूना, एखाद्या गोष्टीवर आमचं "लवकर" एकमत होणं फारच दुर्मिळ...!!! मग ते कोणासाठी तरी एखादी भेटवस्तू खरेदी करणं असो वा कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवरील चर्चा असोत... मतभेद होणारचं...!!! उलट तसं नाही झालं तर आम्हांलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. असे जरी असले तरी आमच्यात "मनभेद" अजिबात नाही. आधी भांडून मग, कधी त्याने, कधी मी कमीपणा घेत, वेळ निभावून नेतो. कदाचित, याच विजोड प्रवृत्तीमुळे म्हणा हवं तर, पण आमची मैत्री मस्त टिकून आहे.
आमची मैत्री अशी,
टिळक-आगरकर जशी...!!!
(टिळक-आगरकरांचे नाव केवळ उदाहरणादाखल... वैचारिक मतभेद असले तरी समान उद्दिष्ट्य आणि निखळ मैत्री हे दर्शविण्यासाठी... )
पुणेकर आणि त्यांचा इरसालपणा, पुणेरी पाट्या हे तर सर्वांसाठी हक्काचे विनोदाचे विषय...!!! त्यातून दुपारी १ ते ४ झोपण्याच्या सवयीचे तर वाजवीपेक्षा जास्तच... चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद म्हणजे बंदच, असे विनोदाने सांगताना त्यांचा दिवसही पहाटे ३-४ वाजता सुरू होतो, हे कोणी लक्षात घेत नाही... आणि हे खुद्द चितळ्यांच्याच एका मुलाखतीत वाचल्याचे स्मरते... मग आता दुपारी घेतली थोडी विश्रांती तर कुठं बिघडलं...? पुणेकर असले तरी माणसंच आहेत ती...!!! जगात कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा माणूस, त्याच्या बोलण्याच्या अंदाजावरुन, कुठेही सहज ओळखता येतो...
पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीला मी कधी गेलो नाही, पण, मानाच्या गणपतींसह इतर मंडळाचे देखावे मात्र अनेकदा पाहिले... कित्येक रविवारच्या संध्याकाळ मस्त पर्वतीहून पुण्याचा रम्य देखावा पाहण्यात घालवल्या... कधी मित्रांसमवेत तळजई... कधी जवळपासचे गड-किल्ले... सिंहगड तर अगदी फार्म हाऊस वाटावे इतके वीकेंड घालवले आहेत... छत्रपतींच्या पावनस्पर्शाने पुलकित झालेले किल्ले आजही खूप सुंदर अनुभुती देतात...
काहीच नसलं तरी शुक्रवारच्या संध्याकाळी सातारा रोड येथील "कोल्हापूरी कट्टा" (आता ते हॉटेल बंद तरी झालंय किंवा दुसर्या नावाने तरी सुरू आहे) मध्ये जाऊन मस्त चिकन थाळी, तांबडा - पांढरा वरपायचा... अन् शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सिटी प्राईड, सातारा रोड, मध्ये एखादा चित्रपट...!!!
जगासाठी पुणे हा एक मोठ्या भूभागाचे क्षेत्र असेल, पण, पुण्याचे पुणेरीपण पेठांमध्येच दडले आहे. फार फार तर शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड, पर्वती आणि आसपासचा प्रदेश आदी यांत सामिल करता येईल... कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणीही मोठ्या संख्येने पुणेकर दिसून येतात... कात्रज, औंध, बाणेर, कोरेगांव पार्क यांना फार तर जुळे पुणे अथवा नवं पुणे म्हणता येईल... विद्यापीठ तर कधी काळी पुण्याहून खूपच दूरचा प्रदेश मानला जात असे, हे आता सांगूनही खोटं वाटेल, इतकं पुणे पसरलं आहे.
पेठांतील रस्ते, त्यावरची होणारी कोंडी, पुण्याच्या बसेस, रिक्षा हे तर ग्रंथ लिहता येईल असे विषय....!!! पण, पेठांतील वाडे, मंडई, विद्यापीठ यांसारख्या जुन्या परंतु डौलदार अन् दिमाखदार वास्तू, हे पुण्याचे खरे वैभव...!!!
ज्ञानोबा माऊली अन् तुकोबारायांचे पुणे...!!! शहाजीराजांच्या बेचिराख झाल्या या प्रांतात पुन्हा नंदनवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे पुणे...!!! स्वराज्य संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुणे...!!! स्वराज्याची सीमा दिल्ली पर्यंत नेणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे पुणे...!!! अटकेपार मराठी ध्वज फडकविणाऱ्या रघुनाथराव पेशवे उर्फ राघोभरारींचे पुणे...!!! ब्रिटिशांनाही चळाचळा कापायला लावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पुणे...!!! थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुलेंचे पुणे...!!! पु. ल. देशपांडे, शांता शेळकेंचं पुणे...!!! विद्येचे माहेरघर अन् महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले पुणे...!!! दुचाकी स्वारांचे, पेन्शनरांचे, विद्यार्थांचे अन् आता IT Hub बनू पहात असलेले पुणे...!!! शुध्द मराठी भाषेचे पुणे....!!! पारंपारिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे पुणे...!!! पुण्याला पुणे म्हणणाऱ्यांचे पुणे...!!!
अशा पुण्याचा पुणेकरांनी जाज्वल्य अभिमान का न बाळगावा...?
पेठांमधील वाड्यांनी आता आपली जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे ग्रामदैवत, कसबा गणपती, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार जिजामाता मासाहेबांनी पुण्यात प्रथम वस्तीस आल्यावर केला, असे सांगितले जाते, त्या आमच्या श्रद्धास्थानाच्या बाजूला मोठी इमारत बांधली जात आहे. त्याच्या आवाजाने त्या दगडी कौलारू मंदिरातील शांतता कमी होत चालली आहे, असे मला वाटते...
हळूहळू का होईना पण पुणे बदलत चाललंय हे मात्र खरं... बदल हा निसर्ग नियमच आहे. या बदलांतही लाल महाल, विश्रामबाग वाडा, केसरी वाडा आदी काही ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहेत किंवा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत...!!! शनिवारवाडा मात्र ब्रिटिश काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला अन् आता त्या भग्नावशेषात केवळ त्याची भव्यता अन् निर्माण केलेल्या हिरवळीतून (बगीचा) त्याच्या सुंदरतेची फक्त कल्पनाच करायची...!!!
बदल, विकास करत असताना आपला हा सांस्कृतिक अन् ऐतिहासिक ठेवा आपण जतन करायलाच हवा असे एक इतिहास प्रेमी म्हणून मला नेहमीच वाटते.
संपूर्ण भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि त्यातील माझे जन्मगाव सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, वैष्णौदेवी (कट्रा) आणि पुणे इथं मला कधीच एकटं वाटत नाही... माझ्या घरात असल्यासारखंच वाटतं...
पुण्यावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे... त्यामुळे आता इथेच थांबतो...!!! राग व्यक्त करताना घडाघडा बाहेर पडणारे शब्द प्रेम व्यक्त करताना थोडेसे अबोल होतात, असंच काहीसं माझं झालं आहे... मनातल्या साऱ्या भावना शब्दांत थोडीच व्यक्त करता येतात? आणि तसंही अखंड बोलत राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार केवळ पुणेकरांनाच आहे...!!!
खरंच, पुणे तिथे काय उणे...?
शेवट करताना पु. लं. ची पुण्यावरची कविता लिहितो,
मी राहतो पुण्यात,
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्र जागा नाही.