गुरुवार, २९ जून, २०१७

पापकर्म

"जगात अशाही काही व्यक्ती आहेत, ज्यांना स्वतःचे पापकर्म वाईट वाटणार नाहीत, पण ते उघड करणाऱ्याचे विचार मात्र नक्कीच वाईट वाटतील...!!!"

आता इथे पापकर्म म्हणजे त्रासदायक, दुष्कर्म, चुकीच्या घटना अशा अर्थाने घ्यावे. 

आता उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा, एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि त्या चोरीच्या वस्तूंपैकी काही वस्तू एखाद्या व्यक्तीकडे सापडल्या किंवा त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. भले त्याने त्या वस्तू स्वत: चोरल्या नसाव्यात, दाम देऊन खरेदी  केलेल्या असाव्यात किंवा चोरीत मदत केली म्हणून चोराने त्यास दिल्या असाव्यात. पण शेवटी त्या चोरीच्याच वस्तू. त्यामुळे पहिली "शंका/संशय" त्यावरच येणार हे कोणाही "बुद्धी" असणाऱ्या व्यक्तीला वेगळे सांगायला नको. त्याने चोरी अथवा चोरीत मदत केली नाही हे त्याला योग्य पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागेल. 

मग त्या व्यक्तीच्या सुरुवातीच्या पुराव्यांवरून, हावभाव/कृतींवरून जर त्याचे चोरांशी काही संबंध आढळलेच आणि त्यावरून त्याला, "तुझे चोरांशी कसे काय संबंध?" किंवा "यापूर्वी कधी चोरीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या का?" किंवा "यापूर्वी कधी चोरी अथवा चोरीत मदत केली का?" असे काही प्रश्न विचारले गेले तर, "असे प्रश्न मला विचारलेच कसे जाऊ शकतात?" असे म्हणणे असंबंध तर आहेच पण मूर्खपणा शाबीत करणारे पण ठरते. कारण असे प्रश्न विचारणारा कितीही जवळचा असला तरी, या गोष्टी "विश्वासा"च्या कसोटीपेक्षा "बुद्धीच्या/तर्कांच्या" कसोटीवर सिद्ध होणे अपेक्षित असते. 

विश्वास तेव्हाच निर्माण होतो,जेव्हा विश्वास ठेवण्यालायक कृती केली जाते. 

शपथा घेऊन खोटे बोलण्यापेक्षा, पुराव्यांनिशी सिद्ध करावे.
उदा. मी चोराशी फारसं बोलत नाही, असे शपथेवर सांगावे आणि त्यांच्या संभाषणाची टेप, कागदपत्रंच उघड व्हावी, असे काहीसे विसंगत. 


त्यामुळे विश्वासाच्या नावाखाली अंध-विश्वासाची अपेक्षा करू नये. 

मग अशा व्यक्ती, त्या उघड करणाऱ्यास, संशयी, "माझ्याच गळ्यात पडलेला", "असल्याचं तोंडही पाहायचं नाही", "लायकी" नसलेला, कमी/छोट्या "खानदानाचा" अशा "शेलक्या" शब्दांचा आहेर करतात. ते केवळ असलाच "आहेर" करू शकतात, कारण बाकी सारा "नगदी आहेर" त्यांनी केवळ घेतलेला असतो. घेण्याचे त्यांना माहीत असते. देण्याचे नव्हे. 

काही "सदा सुखी" व्यक्ती तर, हे प्रश्न त्या घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या व्यक्तीला जोडून, "त्याला असे प्रश्न तुम्ही विचारले असते का?" किंवा "त्याला असे प्रश्न कोणी विचारले तर चालतील का?" असेही तोंड वर करून विचारतात. "विचारणारा कोण आहे", "कशा संबंधात/संदर्भात, कारणावरून विचारतो आहे" याचा विचार न करता, भलताच अर्थ काढून आपली बौद्धिक पातळी दाखवून देतात. "पडलो तरी नाक वर" या न्यायाने, घडल्या घटनांची माफ़ी मागणे, पुन्हा अशी चूक न करण्याची किंवा खबरदारी घेण्याची शाश्वती देणे या गोष्टी तर दूरच पण उलट त्या प्रश्न विचारणाऱ्याचीच, नरकाश्रू ढाळत, बदनामी करणे आणि स्वत:ला निर्दोष दाखवत राहणे, असा उद्योग करतात. 

आपली समाजातील पत, प्रतिष्ठा, वजन, वर्तन, चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून आपले "कसेही वागणे" सहन केले जावे हा केवळ "पोकळ अट्टाहास" आहे. कदाचित, आपल्या अशा वागण्याने, समाजातील तीच पत, प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. नाव कमवायला वेळ लागतो, पण बदनाम व्हायला क्षणही पुरेसा असतो. समाजाला शहनिशा करायला वेळही नसतो आणि गरजही नसते. उलट, एखाद्याचे बदनाम होणे समाजाच्या दृष्टीने मनोरंजनाचा खेळ होतो. नको तिथे "बडेजाव" करणे कदाचित अशा वेळी घातकही ठरू शकते. 

वरील उदाहरणातील चौकशीची बातमी जर समाजात आली तर समाज त्या व्यक्तीस थेट चोर समजून बदनामी करायलाही कमी करणार नाही याची जाण ठेवावी आणि म्हणूनच फुकाचा "माज" दाखविण्यापेक्षा संयमाने अशा गोष्टी हाताळल्या जाव्यात, असे मला वाटते. 

विश्वासाच्या गमजा मारण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रामायण सांगत असतानाही, सीतामाईची रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर, "अग्निपरीक्षा" घेऊनच प्रभू श्रीरामांनी स्वीकार केला होता, असे सांगितले जाते. शहाण्यास जास्त सांगणे न लागे. ती अग्निपरीक्षाही कमी पडली म्हणून, प्रजेच्या शंका निरसनासाठी, नंतर सीतामाईंना वनवासास पाठवले ही पुढची गोष्ट. 

आंधळ्या विश्वासापेक्षा बुद्धीने ठेवलेला विश्वास जास्त भक्कमही असतो आणि चिरंतन टिकतो, हे ध्यानात असू द्या. 

पाप, दुष्कर्म करण्याला घाबरा...!!! त्यांच्या उघड होण्याला किंवा परिणामाला नव्हे...!!! 

तळटीप : वरील लेख, विचार थोडेसे कटू भासत असले तरी, त्यातून मला कोणाचाही अपमान, उपमर्द करायचा नाही, ना कोणाच्याही भावना दुखवायच्या आहेत. तसेच जाणते वा अजाणतेपणी कोणासही बदनाम करण्याचाही हेतू नाही. हे केवळ माझे विचार असून, कोणत्याही व्यक्ती, प्रसंग यांच्याशी त्यांचा आढळेला संबंध केवळ योगा-योग असावा. 


मंगळवार, २७ जून, २०१७

कविता : श्रावण

तृप्त तृप्त ही धरा, साज हरित बावरा |
मिलन होई प्रियकरा, करिते सण साजरा ||१||

शुभ्र कुंद नभही हा, सूर्य भासे हासरा |
ऊन पाऊस पाठशिवी, खेळ जसा नाचरा ||२||

खळ खळ वाहे हा झरा, दुधाचा माठ सांडला |
सरिता धावे माहेरी, आनंदे भेटी बापाला ||३||

धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवा |
चिंब चिंब मन होई, पाहून ऋतू हिरवा ||४||

हर्ष हर्ष जगती या, आनंद व्यापू राहिला |
शांत स्वच्छ मन ही हे, पिऊनी टाकी दुःखाला ||५||

--- जयराज




गुरुवार, २२ जून, २०१७

कविता : शंका

माझ्या पसंतीचीही माझ्या मनास,
"शंका" आता येत आहे ।
सोने समजून पितळास,
मी का पूजत आहे? ।।१।।

"संशयी" तर आधीच मज,
पितळाने ठरविलं होतं ।
अश्रूंतून चमक दावून,
आप्तांसही चकविलं होतं ।।२।।

पितळास ईच्छा, सोने होण्याची,
नव्हती ती जाण, स्वतःच्या अस्तित्वाची ।
प्रकाशापेक्षा आवड, झगमगाट अनुभवण्याची,
अंतरंगापेक्षा बाह्यरूपावर भुलण्याची ।।३।।

पितळ म्हणे, "मीच शुद्ध",
"नजर असे, तुझीच अशुद्ध" ।
"सोन्याच्या गुणांशी, माझा काय संबंध?",
"नसावेत मजवर, सोन्याचे निर्बंध" ।।४।।

चकाके कितीही पितळ जरी,
सोनाराची नजर, पारखी भारी ।
"शंका" घेउनी पितळावरी,
सोनार तयांस, दूर सारी ।।५।।

---- जयराज 


मंगळवार, २० जून, २०१७

इन्द्र जिमि जृंभ पर : अर्थ


कवी भूषण यांनी, "ब्रिज/ब्रज" भाषेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या स्तुती-काव्याचा, मी थोडक्यात येथे, अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 
शेवटच्या २ कडव्यांचा अर्थ वाचताना लागू शकतो पण पहिल्या दोन कडव्यांसाठी मला इंटरनेट (Internet) चा आधार घ्यावा लागला. शब्दार्थापेक्षा भावार्थ समजून घ्यावा हि विनंती आणि काही दुरुस्ती आढळल्यास कळवावे. 


इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर
रावण सदंभ पर रघुकुल राज है ।।

पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर
ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है ।।

दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर
भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है ।।

तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर
त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है ।।


अर्थ:
इंद्र जसा दानवी शक्तींवर, वामन जसा बली (हिरण्यकश्यपुचा वंशज) वर, रघुकुलाचा राजा (प्रभू श्रीराम) जसा रावणावर, शंभू जसा रतीच्या पतीवर (कामदेवावर), परशुराम जसा सहस्त्राजुनावर, वणवा जसा जंगलातील झाडांवर, चित्ता जसा हरणांच्या अन् सिंह जसा हत्तींच्या कळपावर, प्रकाशाचा किरण जसा अंधारावर, श्रीकृष्ण जसा कंसावर प्रभाव टाकतो (हावी होतो), तसा प्रभाव, भूषण सांगतो, शूर शिवाजी राजाचा मुस्लिम पातशाहींवर पडतो. 


मंगळवार, १३ जून, २०१७

कविता : उपवास

हसत हसत बोलत असता, गंभीर ती झाली ।
बोल तिचे ऐकून मित्रा, शकले हृदयाची झाली ।।१।।

"केले नाहीत मी उपवास, केले नाहीत व्रत" ।
"खरंच करायला हवे होते, मिळण्या चांगला वर" ।।२।।

एक छोटी स्माईल देऊन, मीही मग म्हणालो, ।
"करून पहा आता मग, अजून न तुझा जाहलो" ।।३।।

"उपवास न केला म्हणून, मिळाला मज जैसा दुष्ट" ।
"उपवासाने नक्की मिळेल, प्रेमळ, शांत, श्रीमंत अन् सुष्ट" ।।४।।

वाईट नाही ती हो खरंच, वाईट आहे मीच ।
चांगल्या मुलीस कसा मिळेल, माझ्यासारखा नीच? ।।५।।

          --- जयराज 

शुक्रवार, ९ जून, २०१७

कविता : मन उदास उदास

मन उदास उदास,
नसे आनंद मनास ।
कस्तुरीहून दूर जावा,
तिचा नित्याचा सुवास ।। १।

मन उदास उदास,
जणू जगही भकास ।
वाटे बसावे अंधारी,
नसे प्रकाशाची आस ।।२।।

मन उदास उदास,
श्रावणात वैशाख मास ।
सारी सुखे चरणतळी,
नाही उभारी मनास ।।३।।

मन उदास उदास,
जसा एकांगी प्रवास ।
सारे असुनी सोबती,
चाल वाटे एकांतवास ।।४।।

मन उदास उदास,
जावे शरण स्वतःस ।
तुझे आहे तुजपाशी,
परी जागा चुकलास ।।५।।

---- जयराज 


बुधवार, ७ जून, २०१७

मन अन् भावना

मनुष्य हा कितीही प्रगत झाला असला तरी तो एक "प्राणी" आहे , हे शाश्वत सत्य आपण आधी मान्य केले पाहिजे, असे मला वाटते. एक गोष्ट जी मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळी करते ती म्हणजे, त्याची "विचार व्यक्त करण्याची क्षमता", ज्याला आपण "मानवी मन" असे म्हणून ओळखतो. 

मी मुद्दामहून इथे विचार व्यक्त करण्याची क्षमता असे म्हटले आहे. कारण, निसर्गाने/परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे आणि जो प्राणी विचार करू शकतो त्याला मन आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आपली भारतीय संस्कृती तर इतकी उदार आहे कि, केवळ सजीवच काय पण निर्जीवासही मन आहे, असे मानते. तसं नसेल तर उगाच आपण दसऱ्याला शस्त्र, यंत्रं यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो?

पण भावना/विचार व्यक्त करण्याचे तंत्र म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा हे मनुष्य प्राण्यांत इतरांपेक्षा जरा जास्त किंवा पद्धतशीर आहे, असे म्हणावयास हरकत नाही. तसे इतर प्राणीही आपल्या भावना व्यक्त करतातच. उदाहरणच द्यायचं झालं तर आपला पाळीव कुत्रा... आपल्याला पाहताच अंगावर उडी मारतो पण अनोळखी व्यक्तीवर गुरकावुन भुंकतो. नाठाळ घोडा, ओळखीचा/प्रेमाचा (जो त्या घोड्यावर खूप माया करतो, असे त्या घोड्याला जाणवते) माणूस दिसताच, त्याच्या केवळ आवाजाने किंवा हस्तस्पर्शाने शांत होतो. पण बैल, हत्ती? अतिशय सहनशील प्राणी. कितीही त्रास होऊ दे, संपूर्ण सामर्थ्यानिशी गुमानं काम करत राहतात. फार क्वचित प्रसंगी हे आपला त्रागा व्यक्त करतात आणि ते हि रौद्रपणे...!!! 

पण मनुष्य प्राण्याचे असे नसते. भावना कोठे व्यक्त/उघड्या कराव्यात, कोठे लपवाव्यात याचाही तो विचार करतो. तो जितका सहनशील तितकाच उथळपणे भावना व्यक्त करू शकतो. यात एक सूक्ष्म फरक आहे. कुत्रा, घोडा, बैल, हत्ती आदि., व्यक्तीच्या प्रेम करण्याच्या प्रकारावरून त्यास आपलेसे करतात तर मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता, स्वतःचा स्वार्थ आदि. खूप साऱ्या गोष्टींची शहनिशा करतो आणि खात्री पटली तरच आपल्या भावना व्यक्त करतो. निःष्पक्ष प्रेम पाहण्याची दृष्टी जी प्राण्यांत आढळते, तीचा मनुष्य प्राण्यांत अभाव आढळतो. अगदी आढळतच नाही असे नाही, पण फार कमी लोकांमध्ये हि शक्ती दिसून येते, असा माझा एकंदर अनुभव आहे. आता मी काही फार पावसाळे पाहिलेला वयस्कर नसलो तरी जितक्या प्रकारच्या माणसांच्या सहवासात आलो त्यांवरून इतके तर नक्कीच म्हणू शकतो. 

हताश होणं, निराश होणं, दुःखी होणं, आनंदी होणं या साऱ्या लीला सर्वच सजीव (अगदी वनस्पतीसुद्धा) अनुभवतात. फक्त ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेग-वेगळी असू शकते. आपला पालनकर्ता खुश असेल तर दूध-भाकरी खाऊनही खुश असणारा कुत्रा, मालकाच्या दुःखात हाडांकडे (Non-Veg) पाहूनही खुश होत नाही. मालकाच्या केवळ थोपटण्यावरून घोडा, आपल्या मालकाची स्थिती जाणतो आणि मग रमत-गमत जायचे का जीव फुटेस्तोर धावायचे, हे ठरवतो. अशी दुसऱ्याच्या सुख-दुःखात संपूर्ण समर्पित होण्याची वृत्ती किती व्यक्तींकडे दिसून येते? 

भले काही व्यक्ती खूप सहनशील, अबोल, आपले दुःख, त्रास कोणासमोर व्यक्त करत नसतील. पण खरंच ते दुसऱ्याच्या सुखात सुख मानत असतील? का आपल्याला कोणी समजूनच घेणार नाही हि भावना बळावून ते काहीच बोलत नसतील?

आणखी एक फरक म्हणाल तर पहा, आपण आपले प्रेम प्राण्यांप्रती व्यक्त करताना कधी त्यांच्या स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी असण्याचा, त्याची जात, प्रकार यांचा विचार करतो? नाही ना? आपले प्रेम असा भेद प्राण्यांत करत नाही. पण, जेव्हा मनुष्याचा विचार करतो तेव्हा आपण समोर कोण आहे त्याचा विचार करण्यावर भर देतो. म्हणजे आपण एक ठोकताळा बनवला आहे कि, अमुक-अमुक प्रकारची व्यक्ती असली कि ती भावनाप्रधान असलीच पाहिजे. मग त्या व्यक्तीशी आपण कसे वागावे-बोलावे याचे काही अलिखित नियम बनवतो. मग ती व्यक्ती आपल्याशी कशीही बोलो-वागो, खरोखर भावनाप्रधान असो वा असण्याचे ढोंग करत असो, आपण त्याचे भांडवल नाही करायचे. कारण केवळ आपण त्या प्रकारात बसत नाही म्हणून? 

आता यामध्ये मला कोणाचाही द्वेष, राग, अपमान करायचा नाही, किंवा कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाहीत. केवळ माझं एक म्हणणं मांडतोय. 

निसर्गाने मन प्रत्येकाला दिलंय. त्यामध्ये भावनाही भरल्यात. पण परिस्थितींमुळे म्हणा किंवा सततच्या होणाऱ्या अगर झालेल्या आघातांमुळे म्हणा, काहींच्या भावना लोप पावून, मनं कठोर झाली असतील पण म्हणून "सारे सारखेच" असे म्हणायचे? हे कितपत बरोबर वाटते?

"भावना समजून घेतल्या तरच समजतात" हे स्वतःला "बुद्धिमान" समजणारे का नाही समजून घेत? भावना जाणून घेण्याची वेळ येते तेव्हा का अशी माणसे यंत्रवत ठोकताळ्यांसारखी (Algorithm) वागतात? आपल्या कृतींचा विचार न करता, केवळ समोरच्या व्यक्तीच्या कृतींचे विश्लेषण का करत राहतात? भावना जपण्यासाठी माफी मागणे, प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेणे या गोष्टी का घडत नाहीत? केवळ अहंकारामुळे? कि मी कधी चुकतंच नाही, केवळ माझं नशीब खराब म्हणून माझ्यासोबत अशा घटना घडतात असा वृथा अभिमान वजा विचार करून?

पण याचा अर्थ असा नाही कि, प्रत्येक प्रसंगी आपण आपल्याकडे कमीपणा  घ्यावा. कारण "कृष्णाजी नारायण आठल्ये" यांनी आपल्या "प्रमाण" या कवितेत म्हटलेच आहे,

"अती नम्रता पात्र होते भयाला"

त्यामुळे, समोरच्या व्यक्तीची खरंच आपली नम्रता ओळखण्याची "पात्रता" असेल तरच तिथे नम्रपणे वागण्यात अर्थ आहे. नाहीतर आपल्या नम्रतेस समोरची व्यक्ती आपले भय समजून आपली किंमत करणार नाही.  कारण, जसे नम्र असण्यासाठी सुशिक्षित अन् सुसंस्कारित असणे गरजेचे असते, तसे नम्रता समजून येण्यासाठीही ते अत्यावश्यक असते. 

शेवट करताना इतकंच म्हणेन, "मन ओळखणाऱ्या व्यक्तींपेक्षा मन (भावना) जपणाऱ्या व्यक्ती हव्यात. कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी...!!!"

पहा, विचार करा आणि जमल्यास व्यक्तीचे मन पाहायला अन् जपायला शिका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही...!!! मग पहा, नात्यांची मजा आणि भावनेचा स्रोत किती सुंदर असतो ते...!!! भल्या मोठ्या वटवृक्षाचा उगम एका छोट्याशा बीजातच लपलेलं असतो, हे लक्षात ठेवा...!!! आनंदी राहा, आनंदी ठेवा आणि काही चुकले असल्यास, भावना दुखविल्या गेल्यास माफ करा...!!!

हमने तुझको प्यार किया है जितना, 
कौन करेगा इतना?... (२)

तू हि तू है, इन आखों में, और नहीं कोई दूजा ।
तुझको चाहा, तुझको सराहा, और तुझे हि पूजा ।
तेरे दर को मान के मंदिर... (२)
झुकते रहे हम जितना ।
कौन झुकेगा इतना?... (२)



शनिवार, ३ जून, २०१७

कविता : तुझे जाणे

तू निघून गेलीस, अन् खरं सांगू?
दुसऱ्या कोणासही आता, पहावसंही वाटत नाही ।
अन् तू होतीस तेव्हा तरी, आठवतं का तुला?
दुसरी कोणी मला, दिसतंच नव्हती ।।

आहे माहित मजला, तू आता माझं, तोंडही पाहणार नाही ।
म्हणून मग मीच ठरवलं, तूला माझं, तोंडच दाखवायचं नाही ।।

नसतील दिसल्या माझ्या तुजला, खऱ्या भावना,
वाटले असतील बोलही माझे, तुजला कठोर ।
पण होत्या चुकाच तुझ्या, इतक्या गंभीर,
जाणिव तुजलाही व्हावी म्हणून, व्हावे लागले मला कठोर ।।

चूक नव्हती ती तुझी, होता तो विश्वासघात ।
अजूनही तूला न कळे हे, राहिलीस वेड्या भ्रमात ।।

कृतींचा तुज पश्चाताप नाही,
उघड झाल्या त्या, त्यांचं वाईट वाटलं? ।
मर्यादा, बंधन सोडून वागणं,
माझ्या काळजीचं तू, "संशयी" भांडवल केलं ।।

बळावत नसतो संशय, कृतींच्या खताशिवाय ।
मोकळ्या संवादाची औषधी फवारणी, त्यावर एकमात्र जालीम उपाय ।।

माझ्या आठवणी तुजसाठी, केवळ दुःस्वप्न अन् कठोर बोल ।
सोयिस्करपणे विसरलीस माझे, हळवे अन् प्रितीचे बोल ।।

वागली-बोललीस तू कशीही मजसवे ।
मजसाठी तुझ्या मात्र, केवळ सुख आसवे ।।

नसतात गं केवळ, मुलींचीच मनं हळवी ।
असतात काही मुलंही अशी, चुकीस कठोर, पण मनाने हळवी ।।

तूला दाखविता येतात अश्रू, मजसाठी तेही समाजमान्य नाही ।
हलके करायचो मन तुजपाशी, आता तर तोही आधार नाही ।।

आठव साऱ्या घडल्या घटना,
किती केलीस माझी कुचंबना ।
ठेवला तरी मी तुजवर विश्वास,
नाहीच पटले तुझ्या ते मनास ।।

चूकच तूला कळली नाही, मग माफिचा शब्द तरी कुठून येणार? ।
आधी डोळे झाकून दरीत ढकलणार, मगच माझा विश्वास मानणार? ।।

अपेक्षा केलीस तू मजकडून, सतत समजूतदारपणाची ।
आठव कितीदा केलीस कदर, तू माझ्या मनाची? ।।

माझ्या माफिचा अर्थ तूला, तुझ्या अहंकाराचा विजय वाटला ।
ईथेच झाली गफलत तुझी, नात्यांचा तूला भाव न कळला ।।

आता मी एकटा नाही ।
तुझ्या आठवणीं सोबत राही ।।

इतकंच कळलं तुझ्या जाण्याने ।
कोणासही न निवडले, मजसाठी विधात्याने ।।

तूला वाटेल कोणीही चांगला, आता मजपेक्षा ।
न वागशील त्यासवेही असे, हीच मज अपेक्षा ।।

---- जयराज


शुक्रवार, २ जून, २०१७

काही सुभाषितं : भाग २

================================================
१. कालेः मृदुयोः भवति, कालेः भवति दारुणः |
सः साध्नोति परं स्नेहः, विघ्नांश्चापि विनश्यति ||

अर्थ : जी व्यक्ती वेळप्रसंगी मृदू, हळवा बनतो, (अन्) वेळप्रसंगी कठोर, कडक बनतो, असा तो परम प्रेम तर प्राप्त करतोच पण त्याच्या विघ्नांचाही विनाश होतो.
================================================
२. शृंगार वीर करूणा, अदभुत हास्य भयानकः ।
बीभत्स रूद्र शांतः च, काव्ये नव रसा: मतः ।।

अर्थ: शृंगार, वीर, करूण, अदभुत, हास्य/विनोद, भयानक/भीती, बिभत्स, रौद्र आणि शांत असे काव्यात "नवरस (नऊ रस)" मानले जातात. 
================================================
३. येषां न विद्या न तपो न दानं,
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म: ।
ते मृत्यू लोके भुवि भारभूता,
मनुष्यरूपेन मृगाश्चरत्नी ।।

अर्थ: जे शिक्षित नाहीत, ज्यांचे तप नाही, न ते दान करतात. ज्यांच्याकडे ज्ञान, चांगले चारित्र्य, चांगले गुण आणि सदाचार नाहीत. असे सर्व लोक या मृत्यू लोकात (भूमीवर) भार असल्यागत असून, मनुष्य रूपातील मृग चरत असल्यागत जगत आहेत. 
अर्थात, "खायला काळ आणि भुईला भार" असे आहेत. 
================================================
४. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः ।
 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखमाप्नुयात ।।

अर्थ:
सर्व सुखी व्हावेत, सर्व निरोगी व्हावेत. सर्वांनी चांगले तेच पहावे. कोणासही दुःख न लाभावे.
================================================
५. रथेयुतानां परिवर्तनाय, पुरातनानां इव वाहनानां ।
उत्पतीभूमौ तुरुगोत्तमानां, दिश: प्रसस्थे रविरुत्तरस्याम ।।

अर्थ: हा सुर्य देवतेच्या उत्तरायणाचा श्लोक आहे. यामध्ये सुभाषितकार सुर्य नारायणाच्या उत्तराणायचे कारण थोडेसे गमतीदार प्रकारे सांगताना म्हणतो, "आपल्या (सुर्य देवतेच्या) रथाचे जुने झालेले घोडे बदलण्यासाठी, उत्तम घोड्यांची पैदाईश करणाऱ्या उत्तर दिशेला सुर्य प्रस्थान करतो."
================================================
६. आघ्रातं परिचुम्बितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितं ।
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा, तत्र व्यथा मा कृथाः ।।
हे सद्रत्न, तवैतदेव कुशलं, यद्वानरेणादराद ।
अंत:सारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना ।। 

अर्थ: हे एक व्यंगात्मक सुभाषित आहे. त्या व्यंगाचे रहस्य मी नाही सांगणार, पण ज्याला कळेल तो त्याचा आणखी सुंदर आनंद घेऊ शकेल. बस इतकंच सांगेन कि हे व्यंग एका खूप जुन्या लोक कथेवर आधारित असून, सुभाषिताच्या शेवटच्या ओळीत दडलेलं आहे. 

यात सुभाषितकार म्हणतो, "हे चांगल्या रत्ना, माकडाने तुझ्यावर आघात केले, चाटलं, चोखल, चावूनही पाहिलं. शेवटी कंटाळून निराश मनाने तुला जमिनीवर फेकून दिले. पण त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. कारण हे तुझ्या बाबतीत माकडाकडून चांगलेच झाले असे समज. (कारण) प्रत्येक गोष्टीच्या ''गाभ्यात काय आहे?'', हे पाहण्याची इच्छा (उत्सुकता) असणाऱ्या त्याने तुझे दगडाने ठेचून तुकडे नाही केले."
================================================
७. लोभाविष्टो नरो वित्तम, वीक्षते न तु संकटम् ।
दुग्धम् पश्यति मार्जारो, न तथा लगुडाहतिम् ।।

अर्थ: लोभी मनुष्याला धन दिसते, पण त्यामुळे पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल मात्र दिसत नाही. जसे मांजर केवळ दुधाकडे पाहते पण काठी घेतलेल्या हाताकडे नाही. 
================================================
८. क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत ।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम ।।

अर्थ: क्षणा-क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे. क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?
================================================
९. दानं भोगो नाश:, तिस्त्र: गतयो भवन्ति वितस्य ।
यो न ददाति, न भुक्ते, तस्य तृतीया गतीर्भवति ।।

अर्थ: दान देणे, उपभोग घेणे आणि नाश (चोरी आदी स्वरूपात) हे तीन धन जाण्याचे मार्ग आहेत. जो दानही देत नाही, न त्याचा उपभोग घेतो, त्याचे (वित्त) नक्कीच तिसऱ्या (नाश, चोरी) मार्गाने जाते. 
================================================
१०. अर्थानाम् अर्जने दुःखम्, दुःखम् अर्जितानाम् च रक्षणे ।
आये दुखं, व्यये दुःख, धिगर्थाः कष्टसंश्रयाः ।।

अर्थ: धन कमावताना दुःख/त्रास होतो, आणि त्या कमावलेल्या धनाचे रक्षण करतानाही त्रास/दुःख होते. येता दुःख, जाता दुःख अशा कष्टप्रद ठरणाऱ्या धनाचा धिक्कार असो. 
हे सुभाषित, "कोल्हाला द्राक्षे आंबट" असे नसून थोडेसे व्यंगात्मक आहे. याचा भावार्थ असा कि, धन/लक्ष्मी चंचल असून ते येत-जात राहते. त्यामुळे त्यांच्या येण्याने माजूही नये आणि निघून जाण्याने दुःखीही होऊ नये. 
================================================
११. जयन्ति ते सुकृतिन:, रससिद्ध: कवीश्वरा ।
नास्ति येषां यश: काये, जरामरणजं भयम् ।।

अर्थ: सुंदर रचना करणारे (सुकृतिन:) असे रससिद्ध कवी विजयी होतातच. त्यांच्या यशस्वी शरीराला,आजारपण, मृत्यू आदी भय नसतेच. 
अर्थात, "अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकांसी" आणि "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या दोन उक्तींचा समन्वय असणारे हे सुभाषित...!!!
================================================
१२. आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रा:, अमित्रस्य कुतो सुखम् ।।

अर्थ: आळशी मनुष्याकडे विद्या कुठून असणार? आणि अशा अडाणी मनुष्याकडे धन कोठून येणार? अशा निर्धन मनुष्याचे मित्र कोठून असणार? आणि ज्याला मित्रच नाहीत तो सुखी कसा असणार?
================================================
१३. परोपकाराय फलन्ति वृक्षा: ।
परोपकाराय वहन्ति नद्य: ।
परोपकाराय दुहन्ति गाव: ।
परोपकारार्थमिदं शरीरम् ।

अर्थ: परोपकारासाठीच वृक्ष बहरतात, परोपकारासाठीच नद्या वाहतात, परोपकारासाठीच गायी दूध देतात, तसेच (आपले) शरीरही परोपकारासाठीच असावे. 
================================================
१४. गर्जसि मेघम् न यच्छसि तोयं, चातक पक्षी व्याकुलितोऽहम् ।
दैवादिह यदि दक्षिणवातः, क्व त्वं क्वाहं क्व च जलपातः ।।

अर्थ: हे मेघा, तू केवळ गर्जना करतोस पण बरसत नाहीस. मी एक व्याकुळ चातक पक्षी आहे. दुर्दैवाने जर दक्षिणेचे(कडून) वारे वाहू लागले तर, तू कोठे असशील, मी कोठे असेन आणि पाऊस तरी कोठे असेल?
चातक पक्षी केवळ पावसाचे पाणी पितो अशी आख्यायिका असल्याने, "गरजेल तो बरसेल काय?" या म्हणीप्रमाणे चातक पक्षी आपली व्यथा मांडतो, अशी सुभाषितकाराने कल्पना केली आहे. 
================================================
१५. साहित्य संगीत कला विहीन:, साक्षात पशु पुच्छ विषाण विहीन: ।
तृणम् न खादन्नपि जीवनमान:, तद भाग देयम् परम पशुनाम ।।

अर्थ: साहित्य, संगीत, (एखादी) कला यांव्यतिरिक्त असणारी व्यक्ती म्हणजे साक्षात शेपटी आणि शिंगे नसलेला पशुच आहे. जगण्यासाठी अशी व्यक्ती गवत खात नाही हे पशूंचे परम भाग्यच मानावे. 
जसे पु. ल. म्हणतात, "जगण्यासाठी शिक्षण घेताना आपण एखाद्या कलेशी नाळ जुळवावी. कारण ते शिक्षण तुम्हाला जगण्याचे मार्ग/उत्पन्न देत असेल तर ती कला तुम्हाला का जगावे, ते सांगेल."
================================================
१६. हंसः श्वेतः बकः श्वेतः, को भेदो बकहंसयो: ।
नीरक्षीरविवेके तु, हंसो हंसो बको बकः ।।

अर्थ: हंस पांढरा असतो, बगळाही पांढरा असतो, मग हंस आणि बगळ्यात काय फरक आहे? पण जेव्हा पाणी आणि दूध ओळखण्याची (वेगळे करण्याची) वेळ येते, तेव्हा कळते, हंस हा हंस असतो आणि बगळा हा बगळाच. 
एका प्रचलित समाजमान्यतेनुसार, दूध आणि पाणी एकत्र करून राजहंसास दिल्यास, तो केवळ त्यातील दूध ग्रहण करून पाणी शिल्लक ठेवतो, असे म्हटले जाते. 
================================================
१७. काकः कृष्णः पिकः कृष्णः, को भेदो पिककाकयो: ।
वसन्तसमये प्राप्ते, काकः काकः पिकः पिकः ।।

अर्थ: कावळा काळा आणि कोकीळ पण काळाच. मग दोहोंमध्ये काय फरक? वसंत ऋतू येताच कळते कावळा हा कावळा असतो आणि कोकीळ हा कोकिळ...!!!
कोकीळ पक्षी वसंत ऋतूत आपल्या मनोहर आवाजात गातो. 
================================================
सुभाषित १६ आणि १७ एकच अर्थ सांगतात कि व्यक्तीची परीक्षा त्याच्या रंग-रुपावरुन न करता गुणांवरून करावी. 
================================================
१८. शैले शैले न माणिक्यं, मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र, चन्दनं न वने वने ।।

अर्थ : प्रत्येक शिखरावर माणिक मिळेलच असे नाही, प्रत्येक हत्तीपाशी मोती (मोत्याने सजविला) असेलच असे नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र सज्जन आणि प्रत्येक वनात चंदन सापडेल/भेटेल असे नाही. 
================================================
१९.  कृपणेन समो दाता, न भूतो न भविष्यति ।
अस्पृशन्नेव वित्तानि य:, परेभ्यः प्रयच्छति ।।

अर्थ: हा एक काव्यशास्त्रविनोदाचा (व्यंगाचा) भाग आहे. यात असे म्हटले आहे, "कंजूष मनुष्यासारखा दानी मनुष्य न कधी झाला, न भविष्यात कधी होईल. कारण आपल्या धनाला स्पर्श न करताच तो ते इतरांना (वारसाला, चोराला, कर रूपाने राजाला) दान करून टाकतो."
================================================
२०. शनैः विद्या, शनैः वित्तं, शनैः पर्वतमूर्धनी |
शनैः कन्था, शनैः पन्था, पञ्चैतानि शनैः शनैः ||

अर्थ : विद्या सावकाशीने (सखोल) शिकावी. धन सावकाशीने (प्रामाणिकपणे) मिळवावे. पर्वत सावकाशीने चढावा. गोधडी सावकाशीने बनवावी. मार्ग सावकाशीने आक्रमणावा. अशा या पाच गोष्टी सावकाशीने म्हणजेच धीराने कराव्यात.
================================================
२१. गुणा: सर्वत्र पूज्यन्ते, पितृवंश निरर्थक: ।
वासुदेवं नमस्यन्ति, वसुदेव: न मानवा: ।।

अर्थ: गुणांची सर्वत्र वाहवा होते किंवा गुणच सर्वत्र पुजले जातात. वाड-वडिलांचा वंश महत्वाचा नसतो. (जसे) श्रीकृष्णाला नमस्कार केला जातो, (त्याचे वडील) वसुदेवांना नाही. 
स्वकर्तृत्व, स्वगुणांवर मोठे व्हावे. खानदान, मोठ्या आई-वडिलांचे अपत्य या गोष्टी गौण असतात, असे सांगणारे हे सुभाषित...!!!
================================================