मनुष्य हा कितीही प्रगत झाला असला तरी तो एक "प्राणी" आहे , हे शाश्वत सत्य आपण आधी मान्य केले पाहिजे, असे मला वाटते. एक गोष्ट जी मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळी करते ती म्हणजे, त्याची "विचार व्यक्त करण्याची क्षमता", ज्याला आपण "मानवी मन" असे म्हणून ओळखतो.
मी मुद्दामहून इथे विचार व्यक्त करण्याची क्षमता असे म्हटले आहे. कारण, निसर्गाने/परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे आणि जो प्राणी विचार करू शकतो त्याला मन आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आपली भारतीय संस्कृती तर इतकी उदार आहे कि, केवळ सजीवच काय पण निर्जीवासही मन आहे, असे मानते. तसं नसेल तर उगाच आपण दसऱ्याला शस्त्र, यंत्रं यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो?
पण भावना/विचार व्यक्त करण्याचे तंत्र म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा हे मनुष्य प्राण्यांत इतरांपेक्षा जरा जास्त किंवा पद्धतशीर आहे, असे म्हणावयास हरकत नाही. तसे इतर प्राणीही आपल्या भावना व्यक्त करतातच. उदाहरणच द्यायचं झालं तर आपला पाळीव कुत्रा... आपल्याला पाहताच अंगावर उडी मारतो पण अनोळखी व्यक्तीवर गुरकावुन भुंकतो. नाठाळ घोडा, ओळखीचा/प्रेमाचा (जो त्या घोड्यावर खूप माया करतो, असे त्या घोड्याला जाणवते) माणूस दिसताच, त्याच्या केवळ आवाजाने किंवा हस्तस्पर्शाने शांत होतो. पण बैल, हत्ती? अतिशय सहनशील प्राणी. कितीही त्रास होऊ दे, संपूर्ण सामर्थ्यानिशी गुमानं काम करत राहतात. फार क्वचित प्रसंगी हे आपला त्रागा व्यक्त करतात आणि ते हि रौद्रपणे...!!!
पण मनुष्य प्राण्याचे असे नसते. भावना कोठे व्यक्त/उघड्या कराव्यात, कोठे लपवाव्यात याचाही तो विचार करतो. तो जितका सहनशील तितकाच उथळपणे भावना व्यक्त करू शकतो. यात एक सूक्ष्म फरक आहे. कुत्रा, घोडा, बैल, हत्ती आदि., व्यक्तीच्या प्रेम करण्याच्या प्रकारावरून त्यास आपलेसे करतात तर मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता, स्वतःचा स्वार्थ आदि. खूप साऱ्या गोष्टींची शहनिशा करतो आणि खात्री पटली तरच आपल्या भावना व्यक्त करतो. निःष्पक्ष प्रेम पाहण्याची दृष्टी जी प्राण्यांत आढळते, तीचा मनुष्य प्राण्यांत अभाव आढळतो. अगदी आढळतच नाही असे नाही, पण फार कमी लोकांमध्ये हि शक्ती दिसून येते, असा माझा एकंदर अनुभव आहे. आता मी काही फार पावसाळे पाहिलेला वयस्कर नसलो तरी जितक्या प्रकारच्या माणसांच्या सहवासात आलो त्यांवरून इतके तर नक्कीच म्हणू शकतो.
हताश होणं, निराश होणं, दुःखी होणं, आनंदी होणं या साऱ्या लीला सर्वच सजीव (अगदी वनस्पतीसुद्धा) अनुभवतात. फक्त ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेग-वेगळी असू शकते. आपला पालनकर्ता खुश असेल तर दूध-भाकरी खाऊनही खुश असणारा कुत्रा, मालकाच्या दुःखात हाडांकडे (Non-Veg) पाहूनही खुश होत नाही. मालकाच्या केवळ थोपटण्यावरून घोडा, आपल्या मालकाची स्थिती जाणतो आणि मग रमत-गमत जायचे का जीव फुटेस्तोर धावायचे, हे ठरवतो. अशी दुसऱ्याच्या सुख-दुःखात संपूर्ण समर्पित होण्याची वृत्ती किती व्यक्तींकडे दिसून येते?
भले काही व्यक्ती खूप सहनशील, अबोल, आपले दुःख, त्रास कोणासमोर व्यक्त करत नसतील. पण खरंच ते दुसऱ्याच्या सुखात सुख मानत असतील? का आपल्याला कोणी समजूनच घेणार नाही हि भावना बळावून ते काहीच बोलत नसतील?
आणखी एक फरक म्हणाल तर पहा, आपण आपले प्रेम प्राण्यांप्रती व्यक्त करताना कधी त्यांच्या स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी असण्याचा, त्याची जात, प्रकार यांचा विचार करतो? नाही ना? आपले प्रेम असा भेद प्राण्यांत करत नाही. पण, जेव्हा मनुष्याचा विचार करतो तेव्हा आपण समोर कोण आहे त्याचा विचार करण्यावर भर देतो. म्हणजे आपण एक ठोकताळा बनवला आहे कि, अमुक-अमुक प्रकारची व्यक्ती असली कि ती भावनाप्रधान असलीच पाहिजे. मग त्या व्यक्तीशी आपण कसे वागावे-बोलावे याचे काही अलिखित नियम बनवतो. मग ती व्यक्ती आपल्याशी कशीही बोलो-वागो, खरोखर भावनाप्रधान असो वा असण्याचे ढोंग करत असो, आपण त्याचे भांडवल नाही करायचे. कारण केवळ आपण त्या प्रकारात बसत नाही म्हणून?
आता यामध्ये मला कोणाचाही द्वेष, राग, अपमान करायचा नाही, किंवा कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाहीत. केवळ माझं एक म्हणणं मांडतोय.
निसर्गाने मन प्रत्येकाला दिलंय. त्यामध्ये भावनाही भरल्यात. पण परिस्थितींमुळे म्हणा किंवा सततच्या होणाऱ्या अगर झालेल्या आघातांमुळे म्हणा, काहींच्या भावना लोप पावून, मनं कठोर झाली असतील पण म्हणून "सारे सारखेच" असे म्हणायचे? हे कितपत बरोबर वाटते?
"भावना समजून घेतल्या तरच समजतात" हे स्वतःला "बुद्धिमान" समजणारे का नाही समजून घेत? भावना जाणून घेण्याची वेळ येते तेव्हा का अशी माणसे यंत्रवत ठोकताळ्यांसारखी (Algorithm) वागतात? आपल्या कृतींचा विचार न करता, केवळ समोरच्या व्यक्तीच्या कृतींचे विश्लेषण का करत राहतात? भावना जपण्यासाठी माफी मागणे, प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेणे या गोष्टी का घडत नाहीत? केवळ अहंकारामुळे? कि मी कधी चुकतंच नाही, केवळ माझं नशीब खराब म्हणून माझ्यासोबत अशा घटना घडतात असा वृथा अभिमान वजा विचार करून?
पण याचा अर्थ असा नाही कि, प्रत्येक प्रसंगी आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा. कारण "कृष्णाजी नारायण आठल्ये" यांनी आपल्या "प्रमाण" या कवितेत म्हटलेच आहे,
"अती नम्रता पात्र होते भयाला"
त्यामुळे, समोरच्या व्यक्तीची खरंच आपली नम्रता ओळखण्याची "पात्रता" असेल तरच तिथे नम्रपणे वागण्यात अर्थ आहे. नाहीतर आपल्या नम्रतेस समोरची व्यक्ती आपले भय समजून आपली किंमत करणार नाही. कारण, जसे नम्र असण्यासाठी सुशिक्षित अन् सुसंस्कारित असणे गरजेचे असते, तसे नम्रता समजून येण्यासाठीही ते अत्यावश्यक असते.
शेवट करताना इतकंच म्हणेन, "मन ओळखणाऱ्या व्यक्तींपेक्षा मन (भावना) जपणाऱ्या व्यक्ती हव्यात. कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी...!!!"
पहा, विचार करा आणि जमल्यास व्यक्तीचे मन पाहायला अन् जपायला शिका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही...!!! मग पहा, नात्यांची मजा आणि भावनेचा स्रोत किती सुंदर असतो ते...!!! भल्या मोठ्या वटवृक्षाचा उगम एका छोट्याशा बीजातच लपलेलं असतो, हे लक्षात ठेवा...!!! आनंदी राहा, आनंदी ठेवा आणि काही चुकले असल्यास, भावना दुखविल्या गेल्यास माफ करा...!!!
हमने तुझको प्यार किया है जितना,
कौन करेगा इतना?... (२)
तू हि तू है, इन आखों में, और नहीं कोई दूजा ।
तुझको चाहा, तुझको सराहा, और तुझे हि पूजा ।
तेरे दर को मान के मंदिर... (२)
झुकते रहे हम जितना ।
कौन झुकेगा इतना?... (२)